‘अशोक’च्या कर्मचाऱ्यांना भयमुक्त करा
श्रीरामपूर प्रतिनिधी-अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने केलेल्या सदोष कामकाजामुळे उच्च न्यायालयाने सध्या मंडळाचे अधिकार गोठविले आहेत. मात्र याचा फटका कर्मचाऱ्यांना बसू नये म्हणून कार्यकारी संचालकांनी कारखाना व संलग्नीत शैक्षणिक संस्थेतील कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार तसेच दिवाळी बोनस अदा करून सर्वांना आर्थिकदृष्ट्या भयमुक्त करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल औताडे व युवराज जगताप यांनी केली आहे.
याबाबत संघटनेच्यावतीने कार्यकारी संचालकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या संचालक मंडळाचे अधिकार गोठविलेले असताना कार्यकारी संचालकांना संचालक मंडळाचा दैनंदिन कामकाजामध्ये कुठलाही हस्तक्षेप होऊ न देता स्वतंत्र रित्या धोरणात्मक गाळप हंगाम पूर्व तयारी योग्य निर्णय घेऊन कामकाज करणे गरजेचे आहे.
कारखाना अधिकारी कर्मचारी यांचे गेल्या सहा महिन्यांपासून पगार झालेले नाहीत. वेळेत पगार न झाल्याने कामगारांना कामगार पतपेढी, खासगी बँका अथवा वेळप्रसंगी खासगी सावकारांकडून कर्ज घेण्याची वेळ आकस्मात उपसथित झालेल्या कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी येत आहे. तसेच कारखाना हमीवर घेतलेल्या पतपेढीच्या कर्जाचे हप्ते, व्याज व ठेवी पगारातून कपात करूनही कारखान्याकडून पतपेढीला भरणा होत नाही. त्यामुळे कामगारांना नोकरी करूनही मिळत असलेल्या पगारातून सातत्याने व्याज भरण्याची वेळ अनेक वर्षांपासून येत आहे. आज रोजी ३१ मार्चच्या झालेल्या पगाराचे कपात केलेले हप्ते कारखान्याने सहा महिने उलटूनही पतपेढीला जमा केलेले नाही. व गेल्या सहा महिन्यांपासून पगारही नाहीत. त्यामुळे सर्व कामगार आर्थिक दृष्ट्या हतबल झालेले आहेत.
संलग्न शैक्षणिक संस्थेतील शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अनेक वर्षांपासून तुटपुंज्या मानधन वजा पगारावर काम करावे लागत आहे. वास्तविक पाहता शैक्षणिक संस्थेला कोट्यवधी रूपये कारखान्याकडून वर्ग करूनही त्याबाबतचा हेतू स्पष्ट झालेला नाही. तसेच कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरू करून २० वर्षे झाली आहेत. परंतू ते अद्यापही केंद्राच्या नॅक तपासणीस पात्र न ठरल्याने केंद्राची मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे संबंधित प्राध्यापकांचेही भविष्य अंधारात आहे.
तसेच सालाबाद प्रमाणे व्यवस्थापनाने सहकार कायद्यानुसार यावर्षीही व्यवस्थापनाने ८.३३ टक्के बोनसची तरतूद केलेली आहे. सदर केलेली तरतूद ही इतर चांगल्या कारखान्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. तरी कार्यकारी संचालकांनी दिपावलीपूर्वी जास्तीचा बोनस देणेसह आज पर्यंत थकलेले सर्व पगार एक रक्कमी करावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे
पत्रकावर हरिभाऊ तुवर, शरद पवार, शरद बनकर, गोविंद वाघ, दिलीप औताडे, बबन उघडे, अहमद शेख, शरद आसणे, व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले, दत्तू लिप्टे, राम पटारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments:
Post a Comment