देवीच्या उपासकांना शाक्तपंथीय असे म्हणतात. देवीची उपासना म्हणजे शक्तीची उपासना असे म्हटल्या जाते. देवी शक्तीचे, सामर्थ्याचे आणि कर्तृत्वाचे प्रतीक आहे. तुळजापूरची आई जगदंबा, कोल्हापुरची महालक्ष्मीमाता, माहूरची आई रेणुका, हे देवीचे तीन शक्तीपीठे आहेत. तर वणीची सप्तशृंगी माता ही देवीचे अर्ध शक्तीपीठ आहे. अशा प्रकारे संबंध महाराष्ट्रामध्ये देवीची एकूण साडेतीन शक्तीपीठ आहेत. या शक्तीपिठाची ख्याती संबंध महाराष्ट्र जाणतो आणि मानतो. महाराष्ट्रातील तमाम भाविक मंडळी या शक्तिपीठाचे उपासक आहेत. हे आपल्याला समजते. पण आपल्या घरातील साडेतीन शक्तीपीठाचा अंदाज आपण कधी घेत नाही. आपल्या घरातही आपली आई ,बहिण आणि पत्नी हे देवीचे पूर्ण तीन शक्तिपीठे आहेत; तर मुलगी हे देवीचं अर्ध शक्तीपीठ आहे. म्हणजेच थोडक्यात देवीची साडेतीन शक्तीपीठ आपल्या घरातही वास करत आहेत. पण त्यांना आपण समजून घेत नाही. खऱ्या अर्थाने या शक्तीपिठानासमजून घेण्याची आज गरज आहे.
सुरु झाला आहे नवरात्र उत्सव
यानिमित्ताने समजून घेऊया स्त्रीशक्तीला
महालक्ष्मी, जगदंबा, रेणुका आणि सप्तशृंगी माता
वंदन करतो देवीच्या शक्तीपीठाला
त्याच बरोबर आज समजून घेऊया
बहिण, मुलगी, आई, आणि बायकोला
घराघरात नांदणाऱ्या देवीच्या खऱ्या दृश्य स्वरुपात असणार्या या शक्तिपीठाना आपण समजून घेतले पाहिजे. त्यांचा आदर, सन्मान केला पाहिजे. त्यांच्या भावना, संवेदना जाणून घेतल्या पाहिजेत. त्यांचे विचार समजून घेतले पाहिजेत. त्यांना आपले विचार व्यक्त करण्याची संधी दिली पाहिजे. हे झाले तर आम्ही स्त्रीशक्तीला समजून घेतले आहे. असे म्हणायला हरकत नाही.
या देवी सर्वभूतेषु शक्ती रुपेण संस्थिता l
नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः l
असे आपण अत्यंत अभिमानाने म्हणतो. या संस्कृत श्लोकाचा वापर करून अनेक लोक व्यासपीठ गाजवतात. आपले लिखाण बहरदार करतात. पण खऱ्या अर्थाने आपण देवी रूप असणाऱ्या महिलांची खरी शक्ती ओळखली आहे का...? प्रत्येक घराघरात महिलांचा योग्य आदर होतो का...? हा खऱ्या अर्थाने चिंतनाचा विषय आहे. परंपरागत आपल्याकडे स्त्रियांना दुय्यम लेखण्याचा प्रयत्न झालेला आहे.
केवळ पुरुष कमावता असणाऱ्या घरांमध्येच स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. असे नसून..... अगदी कमवती स्त्री असून सुद्धा तिला कर्त्या पुरुषा एवढा मान-सन्मान आजही घरामध्ये दिला जात नाही. आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतानाही.... आजही त्यांना दुर्बल, अबला समजल्या जाते. हे अत्यंत चुकीचे आहे. ज्याअर्थी देवीला शक्तिरूप मानले आहे त्याअर्थी स्त्रियासुद्धा सक्षम असतात.... सामर्थ्यवान, कर्तुत्ववान असतात. हे आम्ही कधी समजून घेणार आहोत. आजही आपल्या समाजात स्त्रियांचा अलंकार असणाऱ्या चुड्याला म्हणजे बांगड्यांना दुर्बलतेचा प्रतीक संबोधल्या जाते. खरे पाहता चुडा म्हणजेच ‘बांगड्या’ ह्या दुर्बलतेचे, असमर्थचे प्रतिक नसून.... सामर्थ्याचे प्रतिक आहे.
'हातात बांगड्या भरा'
म्हणणाऱ्यांनो समजून घ्या
बांगड्या नसतात दुर्बल, कमजोर
त्या असतात 'सामर्थ्यवान' जाणून घ्या
जगातील कोणतीच स्त्री
नसते कधीच अबला
आज स्त्री बनली आहे
खरीखुरी कणखर सबला......
दुर्गा महोत्सव म्हणजे नवरात्र महोत्सव हा देवीने आपल्या नऊ रूपामध्ये असुरांचा, राक्षसांचा संहार कसा केला…? हे आपल्याला सांगतो. देवीच्या या नऊ रूपाचे वर्णन अनेक आरत्या मध्ये आपल्याला वाचायला, ऐकायला मिळते. देवीने युद्धभूमीत केलेला असुरांचा संहार म्हणजे सत्याचा असत्यावर विजय आहे. दुष्ट प्रवृत्तीचा विनाश कशाप्रकारे देवीने केला….? यावरून वाईट प्रवृत्तीचा विनाश करण्याची ताकद स्त्रीमध्ये असते. हे आपण समजून घेतले पाहिजे.
शैलपुत्री, ब्र
या उत्सवात नऊ दिवस आपण सर्वांनी अवश्य देवीची आराधना, उपासना, पूजा-अर्चा करा. उत्साहात आरत्या करा. नऊ दिवस कडकडीत उपवास करा. अनवाणी पायांनी रहा. 24 तास देवीचे नामस्मरण करा. हे सगळे कराच. ही तुमची माझी श्रद्धा आहे. परंतु हात जोडून…. पाया पडून विनंती आहे. या देवी प्रमाणेच आपल्या जीवनात असणाऱ्या स्त्रियांचाही मानसन्मान, आदर अवश्य करा. कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर अन्याय करू नका. त्यांना मनोभावे समजून घ्या. त्यांना स्वातंत्र्याने आणि सुखाने जीवन व्यतीत करण्यासाठी मदत करा.
स्त्रीशक्ती समजण्याचा उत्सव
नवरात्र उत्सवात पूजा होते
देवीच्या वेगवेगळ्या नऊ रूपांची
त्यासोबत मान-सन्मान,आदर करा
प्रत्यक्षात असणाऱ्या देवी स्वरूपाची
युद्धामध्ये संहार केला
राक्षस असुरांचा देवीने
आजही नष्ट होईल वाईट प्रवृत्ती
स्त्री शक्तीच्या यथार्थ रूपाने
देवी उपासना म्हणजे
असते आराधना शक्तीची
म्हणून स्त्री समर्थ असते
जशी संहिता बुद्धी-युक्तीची
या उत्सवात अवश्य करा
पूजा, उपवास दुर्गा मातेचे
त्यासोबत समजून घ्या
जीवनात असणारे महत्त्व स्त्रीचे
अनंत रूपे देवी वास करते
या खऱ्याखुऱ्या मानवी जगात
आई, बहीण, पत्नी, मुलगी
बनून जीवन जगते या जीवनात
कायम लक्षात ठेवा सर्वांनी
स्त्री प्रतीक आहे मांगल्याचे
तिच्यावर कधी अन्याय करू नका
तिच्यामध्ये रूप आहे रणरागिणीचे
लेखक / कवी
©®मयूर मधुकरराव जोशी
No comments:
Post a Comment