एकलहरे | प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक विद्युत दिव्यांसाठी उभारण्यात आलेले काही पोल जागेवरून गायब झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पोल नसल्याने अनेक ठिकाणी विद्युत वायर तुटलेल्या अथवा खाली लोंबकळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांसह लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि जनावरांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अपघाताचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी पूर्वी विद्युत दिव्यांचे पोल होते, ते आता दिसत नाहीत. संबंधित ठिकाणी नवीन खांबही उभारण्यात आलेले नसल्याने रात्री परिसरात अंधाराचे वातावरण निर्माण होत आहे.
याशिवाय, संबंधित पोल आणि त्यावरील एलईडी दिवे इतरत्र वापरण्यात आले आहेत का, याचीही निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासाठी दिव्यांचे सिरियल नंबर, मॉडेल नंबर व उपलब्ध नोंदींची पडताळणी करून संबंधित साहित्य नेमके कुठे वापरण्यात आले किंवा हलविण्यात आले आहे का, याचा तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते नसीर शेख यांनी या प्रकरणासंदर्भात विविध शासकीय कार्यालये व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी केल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार अद्याप या तक्रारींवर ठोस कारवाई झालेली नसून संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही. या दाव्याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
ग्रामपंचायतीने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित नोंदी सार्वजनिक कराव्यात, तुटलेल्या वायरची दुरुस्ती करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन खांब उभारावेत आणि वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
No comments:
Post a Comment